
ईश्वरपूर :(प्रतिनिधी-राजेश कांबळे) कुरळप पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विक्रम पाटील यांच्या अभिनव संकल्पनेतून “शांततेसाठी पोलिस ठाणे” या उपक्रमाअंतर्गत भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांमुळे परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण होत असून युवकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळत आहे.
या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ईश्वरपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी (DySP) अरुण पाटील यांनी स्वतः उपस्थित राहून या उपक्रमाचे कौतुक केले.
समाजात शांतता, एकोपा आणि पोलिस-जनतेतील विश्वास वाढवण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील म्हणाले की, “समाजात शांतता व सलोखा टिकवण्यासाठी केवळ कायदा व सुव्यवस्था पुरेशी नसून, नागरिकांशी सुसंवाद आणि विश्वास निर्माण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. या उद्देशातूनच या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. युवकांनी अशा सकारात्मक उपक्रमांमध्ये सहभागी होऊन आपली ऊर्जा योग्य दिशेने वळवावी, तसेच पोलिस व नागरिक यांच्यातील नाते अधिक दृढ व्हावे, हीच या उपक्रमामागची भावना आहे.”
या अभिनव उपक्रमाचे कुरळप पोलिस ठाणे हद्दीतील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात स्वागत होत असून, विक्रम पाटील आणि सर्व पोलिस कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. युवकांमध्येही या स्पर्धांबद्दल विशेष उत्साह दिसून येत आहे.



